रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-साखरप्यात मुस्लिम समाजाची सुमारे १०-१२ घरे आहेत. जवळच एक मशीददेखील आहे. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वीदेखील तेथे हिजरी नववर्षाचा अर्थात मोहरमचा सण मोठ्या आनंदात साजरा करत असत. आजही साजरा करतात; पण आता त्याचे स्वरूप काळानुसार बदललेले आहे.
त्या वेळी चिव्याच्या काठ्यांचा एक उत्तमपैकी डोलारा तयार करून, त्याला रंगीत कागद वगैरे लावून तो सजवून त्याचा उत्सव करत असत. खेळही करत असत. ताशाच्या तालावरती ते सर्व नाचत असत. काही जणांच्या अंगात पीर येतो, अशी समजूत होती. कत्तलीच्या रात्री, मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास सर्व लोक पेठ इभ्रामपूरमधील (सध्याचे कोंडगाव-साखरपा) आमच्या चौसोपी वाड्याच्या बाहेरील दिंडी दरवाज्याकडील मुख्य अंगणात त्या ताबुतासह वाजतगाजत येत असत. ताबूत अंगणात आणल्यावर, त्यांच्यापैकी मुख्य काजीला आमच्या घरातील कर्त्या पुरुषाकडून एक शेर पिठीसाखर व चांदीचा एक रुपया देत असत. नंतर काजी ताबूतापुढे या वस्तू ठेवी व फारसी भाषेमध्ये जापसाळ करीत असे. त्यानंतर ताबुताबरोबर आलेली मंडळी ताशाच्या तालावर बराच वेळ नाचत असत. त्यामध्ये ज्याच्या अंगात पीर आला आहे, तो माणूस उघड्या छातीवरदेखील तलवार मारून घेई; पण त्यास काहीही इजा होत नसे, असे आमचे आजोबा, त्यांनी स्वतः पाहिले असल्याचे सांगत असत. त्यानंतर सुमारे अर्धा-एक तासाने ही सर्व मंडळी मशिदीकडे परतत असत. नंतर त्या ताबुताचे नदीमध्ये विसर्जन केले जात असे. हल्ली काळाच्या ओघात सुमारे ६० वर्षे ही प्रथा बंद झाली आहे.
इथे एक विचार मनात येतो, ज्या अंगणातून श्री ग्रामदेवतेची पालखी थाटात नाचत येते, त्याच अंगणात मोहरमचा सणदेखील तेवढ्याच थाटात रंगत होता, हे त्या काळचे सर्वधर्मसमभावाचेच एक उदाहरण नव्हे का?
- चैतन्य गिरीश सरदेशपांडे, साखरपा